कुंडल (ता. पलूस) : क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि., कुंडल यांच्या वतीने उसातील पाण्याचा कार्यक्षम वापर आणि आधुनिक सिंचन व्यवस्थापन याविषयी ‘मॉइश्चर सेन्सर्स (ओलावा संवेदक)’ या विषयावर शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता कारखाना परिसरातील क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड स्मारक येथे होणार आहे.
यंदा कमी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे ऊस पिकावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. उपलब्ध पाण्याचा काटेकोर व वैज्ञानिक पद्धतीने वापर करण्यासाठी मॉइश्चर सेन्सर्स उपयुक्त ठरत असल्याचा अनुभव अनेक शेतकऱ्यांना आला आहे. या पार्श्वभूमीवर लागण हंगाम २०२६–२७ मधील ऊस पिकासाठी ऊस विकास योजनेअंतर्गत मॉइश्चर सेन्सर्स उपलब्ध करून देण्याचा उपक्रम कारखान्याच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या योजनेची माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अरुण (अण्णा) लाड हे उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्रासाठी जिल्हा कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ तसेच फायलो टेक्नो प्रा. लि.चे विपणन व्यवस्थापक विशालकुमार मिरजे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून शेतकऱ्यांना मॉइश्चर सेन्सर्सचे महत्त्व, त्याचा वापर, पाणी बचत आणि उत्पादनवाढ याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, कारखान्याचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, व्हाईस चेअरमन जयप्रकाश साळुंखे यांनी परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या चर्चासत्राला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!